Growth in premature babies – Sakal Times

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : गेल्या काही वर्षांमध्ये प्री-मॅच्युअर बेबींचे (मुदतपूर्व बालके) जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. उशिरा लग्न केल्यामुळे गर्भधारणेचे वाढते वय हे देखील एक कारण असल्याचे मत डॉक्टरांनी नोंदवले आहे. १७ नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड प्री-मॅच्युअर बेबी डे म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नवी मुंबईतील नामांकित रुग्णालयातील स्त्री-रोग तज्ज्ञांनी हे निष्कर्ष काढला आहे.
चाळीशी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या मातांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचा धोका जास्त असतो. मुदतपूर्व म्हणजे प्रसूतीच्या ठराविक कालावधी (३७ आठवडे) आधीच बाळ जन्माला येणे. या बाळांची पुरेशी वाढ न झाल्याने त्‍यांचे वजन कमी असते. त्यामुळे या बाळांच्या सुरुवातीचे काही दिवस अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षांमध्ये करिअर, शिक्षणामुळे स्थिरस्थावर न झाल्याने मुली उशीरा लग्न करत आहेत. परिणामी, गर्भधारणेचे वयही वाढले आहे. आता काही महिला वयाच्या पस्तीशीनंतर तर काही महिला अगदी चाळीशीनंतरही गर्भवती होण्याचा निर्णय घेत आहे. या वयामध्ये प्रजनन क्षमता कमी होते. त्यामुळे गर्भधारणा होणे ही फार अवघड असते. एआरटीसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आणखीनच शक्य झाले आहे. परंतु उशीरा गर्भधारणा झाल्याने बाळ मुदतपूर्व जन्माला येण्यासह अनेक गुंतागुंत होऊ शकतात, असे मेडिकव्हर रुग्णालयाच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी सांगितले.
खारघर येथील मदरहुड रुग्णालयातील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ म्हणाल्या, ‘‘ज्या मातांचे वय ३५ पेक्षा जास्त आहे त्यांना अकाली बाळ होण्याची शक्यता असते; पण प्रत्येक प्रकरणांमध्ये असे होत नाही. अकाली जन्मलेल्या बाळांना श्वासोच्छवासाचा त्रास, कमी प्रतिकारशक्ती आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या असू शकतात.

 
 

———————
वाढत्या वयातील गर्भधारणा धोक्याची
वाढत्या वयासोबत गर्भधारणा होणे ही गोष्टही फार धोकादायक ठरू शकते. त्याचे मातेसह बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. अकाली जन्मलेल्या बाळाला श्वसनाचा त्रास, कावीळ यासोबतच अशक्तपणा, चिंता निर्माण होणे. तसेच प्रतिकारशक्ती कमी असणे, न्यूरोलॉजिकल विकार, श्रवणशक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या आणि कमकुवत स्नायूंचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या बालकांची रुग्णालयातच नाही, तर घरी आल्यावरही अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला घरी घेऊन जाताना मातांनी डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. बाळाला ऍलर्जी, इन्फेक्शन आणि विविध रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी स्तनपान गरजेचे आहे, असे मेडिकव्हर रुग्णालयाचे नवजात बालकांच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. नरजॉन मेश्राम यांनी सांगितले.